तभा परिवार
23 Oct 2016 “सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. आता आपण सातारा, सांगली, कोल्हापूर आणि इकडे संभाजीनगर येथूनही आवृत्ती प्रकाशित करु लागलो आहोत. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील मराठी वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.
‘तरुण भारत’ प्रथम नागपुरात सुरु झाले. राष्ट्रीय विचाराचा पाठपुरावा करण्याचे व्रत घेऊन हे वृत्तपत्र सुरु झाले. पुढे पुणे येथे ‘तरुण भारत’ने पदार्पण केले. विस्ताराची ही यात्रा अशीच सुरु राहिली. मुंबई, जळगाव, संभाजीनगर, सोलापूर असा प्रवास झाला. चढ-उतार, यश-अपयश सगळे या यात्रेत अनुभवले. आणि ठिकठिकाणच्या संस्थांनी ‘तरुण भारत’ला चोखंदळ वाचकांच्या हाती देणे सुरु ठेवले.
‘तरुण भारत’ हे केवळ एक दैनिक नाही. म्हणूनच तो केवळ व्यवसायही नाही! खूप गुंतवणूक, नव्यातले नवे तंत्रज्ञान, पानांची संख्या या निकषांवर कदाचित ‘तरुण भारत’ सर्वोत्तम ठरणार नाहीही पण सर्वदूर वाचकांची जी आत्मीयता ‘तरुण भारत’ला मिळतानाचा सतत जो अनुभव येतो तो कितीजणांच्या वाट्याला येतो?
‘तरुण भारत’ एक अभियान आहे. भारतीय अस्मितेला सर्वोच्च प्रधान्य देणारे, राष्ट्र हेच दैवत मानणारे, समाजात सर्वदूर स्नेहभाव, समरसता आणि सौजन्य निर्माण व्हावे असा ध्यास असणारे, विज्ञान आणि अध्यात्माच्या पायावर समाज परमवैभवाला जावा असे ध्येय असणारे हे अभियान आहे. आपणही या अभियानाचे अंग बनावेत, हीच अपेक्षा!
‘वंदे मातरम्!’
-विवेक घळसासी
अध्यक्ष, सोलापूर तरुण भारत मिडिया लि. सोलापूर.